लोलो लागला अंबेचा: रेणुका मातेची प्रसिद्ध गोंधळ आरती | Lolo lagala ambecha aarati lyrics
लोलो लागला अंबेचा' ही आरती केवळ गाणे नसून ते एक अध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. प्रपंच खोटा आणि रेणुका सत्य, हे सांगणाऱ्या तानाजी देशमुख रचित आरतीचा सविस्तर अर्थ वाचा.
श्री रेणुका माता आरती


"लोलो लागला" ही आरती आपल्याला शिकवते की, गोंधळ घालणे म्हणजे केवळ आरडाओरडा करणे नव्हे, तर आपल्यातील अहंकाराचा बळी देऊन आईशी एकरूप होणे होय. संसारातील नश्वर गोष्टींमध्ये अडकून न पडता, त्या शाश्वत रेणुकेचा ध्यास घेणे म्हणजेच खरा 'लोलो' लागणे होय.
आरती
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी ।
कन्या-सुत-दारा-धन माझे, मिथ्या वदतो वाणी ।
अंती नेतील हे यमदुत, न ये संगे कोणी ।
निर्गुण रेणुका कुळदेवी, जपतो मी निर्वाणी ।। १ ।।
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
पंचभूतांचा अधिकार, केलासे सत्वर ।
नयनी देखिला आकार, अवघा तो ईश्वर ।
नाही सुख – दुःख देहाला, कैचा अहंकार ।
पाहे परमात्मा तो ध्यानी, भासे शून्याकार ।। 2 ।।
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी, लागे अनुसंधानी ।
निद्रा लागली अभिध्यानी, जें का निरंजनी ।
लीला वर्णिता स्वरूपाची, शिणली शेशवाणी ।
देखिला भवानी जननी, त्रैलोक्यपावनी ।। ३ ।।
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
गोंधळ घालील मी अंबेचा, घोष अनुहाताचा ।
दिवट्या उजळूनिया सदोदित, पोत चैतन्याचा ।
आहं सोहं से उदो उदो, बोलली चारी वाचा ।
लोलो लागला ।। ४ ।।
अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
पाहता मूळपीठ पर्वत, सकळामध्ये श्रेष्ठ ।
जेथ जगदंबा अवधूत, दोघे भोपे भट ।
जेथे मोवाळे विंजाळे, प्रणीता पाणी लोट ।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ ।। ५ ।।
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा ।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु ।।
अंबेच्या भक्तीचा 'लोलो'
महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात आणि भक्ती परंपरेत 'गोंधळ' या विधीला खूप महत्त्व आहे. जेव्हा संबळ आणि तुणतुणे वाजते, तेव्हा अंगात वीरश्री संचारते. पण काही आरत्या अशा आहेत, ज्या केवळ गोंधळ घालत नाहीत, तर मानवी मनाला संसाराच्या मोहातून बाहेर काढून ईश्वराकडे नेतात.
त्यातीलच एक अत्यंत प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण आरती म्हणजे "लोलो लागला अंबेचा". ही आरती वरवर पाहता साधी वाटली, तरी यात अद्वैत वेदांत आणि वैराग्य ठासून भरले आहे. 'लोलो' या शब्दाचा अर्थ आहे - छंद, ध्यास किंवा तीव्र ओढ. आई रेणुकेच्या भक्तीचा असा छंद लागला की आता संसाराची गोडी उरली नाही, हे या आरतीचे मुख्य सार आहे.
आज आपण तानाजी देशमुख यांनी रचलेल्या या आरतीचे शब्द आणि त्यामागील सखोल अध्यात्मिक अर्थ समजून घेऊया.
आरती चा अर्थ
ही आरती म्हणजे एका भक्ताचा संसार ते मोक्ष असा प्रवास आहे.
धृवपद : विषयाचा कंटाळा आणि भक्तीचा लोलो
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा...
भावार्थ: मला माझ्या आई रेणुकेचा 'लोलो' (तीव्र ओढ/छंद) लागला आहे. आता माझ्या मनात देव आणि भक्त असा भेद उरला नाही. मला सांसारिक विषयांचा (सुख-भोगांचा) कंटाळा आला आहे, कारण हे सर्व मायेचे खेळ (धंदा मूळ मायेचा) आहेत, हे मला उमजले आहे.
कडवे १ : प्रपंच हे मृगजळ
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे...
भावार्थ: मृगपाणी: वाळवंटातील मृगजळ. हरीण पाण्याला खरे समजून धावते, तसा माणूस संसाराला खरे समजून धावतोय.मुलगा, बायको, धन हे सर्व माझे आहे, असे आपण म्हणतो, पण ते खोटे (मिथ्या) आहे. शेवटी यमदूत नेतील तेव्हा कोणी सोबत येणार नाही. त्यामुळे मी आता शेवटच्या क्षणी (निर्वाणी) फक्त माझ्या 'निर्गुण रेणुकेचे' नामस्मरण करत आहे.
कडवे २ : अद्वैत दर्शन आणि अहंकार मुक्ती
पंचभूतांचा अधिकार... नयनी देखिला आकार...
भावार्थ: जेव्हा ज्ञान होते, तेव्हा पंचमहाभूतांवर (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) विजय मिळवता येतो.आता मला जो आकार दिसतो, तो सर्व ईश्वरमय आहे. माझ्या देहाला सुख-दुःख राहिले नाही आणि अहंकारही गळून पडला आहे. ध्यानात आता फक्त शून्याकार (निराकार) परमात्मा भासत आहे.
कडवे ३ : उन्मनी अवस्था आणि शेषनाग
ध्याता मुद्रा ही उन्मनी... शिणली शेशवाणी...
भावार्थ: ध्यानाला बसल्यावर 'उन्मनी अवस्था' (समाधीची स्थिती) लागली आहे. त्या निरंजन (पवित्र) स्वरूपाचे वर्णन करताना खुद्द हजार तोंडांचा शेषनाग सुद्धा थकून गेला (शिणली शेशवाणी), तर मी काय वर्णन करणार? अशा त्या तिन्ही लोकांना पावन करणाऱ्या जननी भवानीला मी पाहिले आहे.
कडवे ४ : सोहं आणि अंतर्गत गोंधळ
गोंधळ घालील मी अंबेचा... आहं सोहं से उदो उदो...
भावार्थ: हा गोंधळ बाहेरचा नाही, तर आतला आहे. 'अनुहत नाद' (मनातील ओंकार)चा घोष सुरू आहे.मी चैतन्याचा (ज्ञानाचा) पोत पेटवला आहे. आहं सोहं: 'ते ईश्वरी तत्त्व मीच आहे' या भावनेने माझी वाचा 'उदो उदो' बोलत आहे.
कडवे ५ : माहूरगड आणि तानाजी देशमुख
पाहता मूळपीठ पर्वत... तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ...
भावार्थ:सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ असे माहूरचे मूळपीठ मी पाहिले. जिथे साक्षात जगदंबा आणि दत्तगुरू (अवधूत) वास करतात. जिथे पाण्याचे पवित्र लोट वाहत आहेत. अशा या पवित्र ठिकाणी, या आरतीचे रचनाकार 'तानाजी देशमुख' हे देवीच्या भक्तीत लीन होऊन 'ब्रह्मनिष्ठ' (ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहे असा) झाले आहेत.